मला महाराष्ट्रात सुरक्षित उद्धव ठाकरेंमुळे वाटते – अनुराग कश्यप


मुंबईची तुलना अभिनेत्री कंगना राणावतने पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून तिच्यावर अनेकांनी टीकास्त्र डागले आहे. तसेच त्यावर बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनीदेखील आपली भूमिका मांडली आहे. यामध्येच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने भाष्य केले आहे. त्याचबरोबर मला महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे सुरक्षित वाटते, असे तो एका मुलाखतीदरम्यान म्हणाला आहे.

कोणाचीही बाजू मी घेत नाही. पण महाराष्ट्रात मला खरच फार सुरक्षित वाटते. मी खुलेपणाने येथे माझे मत मांडू शकतो. ज्या गोष्टी गेल्या काही काळापासून घडत आहेत. त्या पाहून माझी शिवसेनेप्रती प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे घडले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मतांशी मी सहमत नसेलही, पण मला महाराष्ट्रात कायम सुरक्षित वाटते, असे अनुराग कश्यप म्हणाला. पुढे तो म्हणतो, सध्या पाहायला गेले तर सरकार लोकांचे लक्ष खऱ्या मुद्द्यांवरुन बॉलिवूडकडे केंद्रित करत आहे. काँग्रेस समर्थक मी नाही, पण सध्या सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, त्याचा विरोध मी करत आहे.