सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अटक करुन त्यांची नावे जाहीर करा : प्रकाश आंबेडकर


पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच एका ऑनलाईन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी राज्यातील काही पोलीस अधिकारी प्रयत्न करत होते. देशमुखांच्या या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक झाली पाहिजे. त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे अनिल देशमुख यांनी जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात चेंडू असून त्यांनी निर्णय घ्यायचा असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वेबसाईटला मुलाखत देताना सांगितले की, राज्यातील काही आयपीएस अधिकारी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचा त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या धक्कादायक खुलासा केल्यानंतर राज्यातील पोलीस दलात खळबळ उडाली. या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेत नावे जाहीर करण्याची मागणी केली आहे.