
बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी लखनऊमध्ये सीबीबआयचे विशेष न्यायालय येत्या 30 सप्टेंबरला आपला निर्णय देणार आहे. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 32 मुख्य आरोपींना सुनावणीत सामील होण्यास सांगितले आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी आणि कल्याण सिंह यांचा समावेश आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश एसके यादव या प्रकरणाचा निकाल सुनावणार आहेत.
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय 30 सप्टेंबरला देणार निकाल
याआधी विशेष न्यायाधीशांनी 22 ऑगस्टला सुनावणी पुर्ण करण्याचा कालावधी एक महिने वाढवून 30 सप्टेंबर केला होता. न्यायालयाने ट्रायल पुर्ण करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला होता. सुनावणी दरम्यान वरिष्ठ वकील मृदल राकेश, आयबी सिंह आणि महिपाल अहलुवालिया यांनी आरोपींच्या वतीने तोंडी युक्तिवाद सादर केला.
सुनावणी दरम्यान सीबीआयने आरोपींविरोधात 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रे सादर केली आहेत. निर्णय घेताना न्यायालयाला सीबीआयचे साक्षीदार व कागदपत्रांचा विचार करावा लागतो. एजन्सीने 400 पानांची कागदपत्रे यापूर्वीच दाखल केली आहे.
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात न्यायालयाचा निर्णय तब्बल 28 वर्षांनी येणार आहे. कारसेवकांनी डिसेंबर, 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पाडली होती.
