कंगना राणावत आणि निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणानंतर राज्यातील राजकारण तापलेले असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचे लक्ष आता केवळ कोरोनावर आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा प्रयत्न केला जात असून, वेळ आल्यावर मी यावर बोलणार आहे.
कोरोनाच्या स्थितीबात सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की 15 सप्टेंबरपासून एक हेल्थ चेकअप मिशन लाँच करणार आहे. मेडिकल टीम घरोघरी जाऊन आरोग्याची माहिती घेईल. ते म्हणाले की, काहीजणांना वाटत आहे कोरोना संपला आणि त्यांनी राजकारण सुरू केले आहे. जे राजकारण करत आहेत त्यांना करु द्या. मात्र महाराष्ट्राची बदनामी मुळीच सहन करणार नाही. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून, वेळ आल्यावर मी या राजकारणावरही बोलणार आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/PcA6OQvBuR
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 13, 2020
उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्हाला आशा आहे आणि प्रार्थना करत आहे की लस डिसेंबर, जानेवारीपर्यंत उपलब्ध होईल. आम्ही राज्यात 15 सप्टेंबरपासून प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी करणार आहोत. राज्यातील ऑक्सिजनची कमतरता संपवण्याचा देखील प्रयत्न करत आहोत. राज्यातील 29.5 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.
मराठ समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुर्ण प्रयत्न करणार असून, आम्ही विरोधी पक्षाशी देखील चर्चा केल्याचे, उद्धव ठाकरे म्हणाले.