
पैशाची थैली मोकळी सोडणाऱ्या रुग्णांना कोठेही बेड उपलब्ध होत आहे. गरीब रुग्णांना मात्र मारण्यासाठी मोकळे सोडून दिले जात आहे. ठाकरे सरकार करोनाबाबत गंभीर नाही. त्यांचे निर्णय आणि नियम केवळ कागदावरच असून त्याची अंमलबजावणी होत नाही, अशा शब्दात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली.
करोनाबाबत सरकारचे निर्णय कागदावरच: देवेंद्र फडणवीस
सभागृहात पत्रकार अर्णब गोस्वामींवर हक्कभंग आणण्यापेक्षा करोनावर, शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर, पूरस्थितीवर चर्चा होणे आवश्यक आहे. ती होणार नसेल तर आम्ही इथे आलो कशाला, असा सवाल करीत फडणवीस यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
करोना संकटाच्या काळात सरकारवर टीका करण्याची आम्हाला हौस नाही. या काळात आम्ही संयमानेच वागेलो आहोत. मात्र, सरकार करोनाबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये मृत्युदरात वाढ झालेली आहे. देशात करोनामुळे झालेल्या मृत्यूंपैकी निम्मे महाराष्ट्रात झाले आहेत. राज्यात करोनाचे नवे हॉटस्पॉट तयार होत आहेत. करोना संसर्गाबाबत विरोधी पक्षांनी सरकारला काही गोष्टी सांगितल्या. अनेकदा पत्र पाठविली. मात्र, सरकारकडून कोणताही प्रतिसाद नाही. एकही पत्राला उत्तर नाही. महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. मात्र करोनातही महाराष्ट्राने आघाडी घ्यावी अशी आमची इच्छा नव्हती. प्रत्यक्षात महाराष्ट्राची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही इतके करोनाचे थैमान वाढले आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.
