सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : प्रसार माध्यमांना मुंबई उच्च न्यायालयाचा संयम बाळगण्याचा सल्ला


मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बॉलिवूड सीबीआयकडे सोपवली. सीबीआयकडे चौकशी सोपवल्यानंतर या प्रकरणी अनेक नवी माहिती समोर आली. दरम्यान, सुशांत सिंह प्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ थांबवण्यासाठी ८ माजी आयपीएएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकांवर सुनावणी पार पडली. न्यायालयाने सुनावणी दरम्यान माध्यमांना संयम बाळगण्याचे सांगितले आहे.

सुशांत सिंह प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर मीडिया ट्रायल थांबवण्यासाठी आठ माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी ३१ ऑगस्ट रोजी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. माध्यमांनी सुशांत सिंह प्रकरणी वार्तांकन करताना संयम बाळगावा. तसेच तपासावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही अशाप्रकारे वार्तांकन करावे, असे सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले.

मीडिया ट्रायल विरोधात मुंबई उच्च न्यायालयात राज्यातील माजी डीजीपी एम.एन.सिंग, पी.एस. पसरिचा, डी.के.सिवानंदन, संजीव दयाल, सतीश माथूर, के.सुब्रमण्यम, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी.एन. जाधव आणि माजी अतिरिक्त डीजीपी के.पी.रघुवंशी यांनी याचिका दाखल केली होती. नैतिकदृष्ट्या, निष्पक्षपणे आणि वस्तुनिष्ठ या प्रकरणाचा तपास केला जावा. तसेच पोलीस किंवा अन्य लोकांच्या विरोधात वार्तांकन हे मोहिमेसारखे बदलू नये, असे याचिकाकर्त्यांनी नमूद केले होते.