त्या समाजसेविकेची एक्झिट उदयनराजेंच्या जिव्हारी


सातारा – “कोमल न्यू लाईफ फाउंडेशन” या संस्थेच्या माध्यमातून त्यामार्फत ऑर्गन डोनेशनसाठी खूप मोठे काम करणाऱ्या तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती करणाऱ्या शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार -गोडसे हिचे जाणे सातारकारांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी असल्याची भावना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. स्वभावाने अत्यंत प्रेमळ, मनमिळावू, हसतमुख अशा कोमलला “सातारकर” नेहमी स्मरणात ठेवतील. माझ्या अगदी लहान बहिणीप्रमाणे असलेल्या कोमलला भावपूर्ण श्रद्धांजली असा शोकसंदेश उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी.सातारा शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार -…

Posted by Chhatrapati Udayanraje Bhonsle on Tuesday, 1 September 2020

यासंदर्भात उदयनराजे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून त्यात ते म्हणतात, सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी.

सातारा शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार – गोडसे हीला २०१७ साली “प्लमोनरी हायपरटेन्शन” या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले, पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ति मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली आणि कोमल ठरली होती महाराष्ट्रातील पहिली “दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण” झालेली व्यक्ती. पण ३ दिवसापूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे शिफ्ट केले, परंतु आज पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला.

कोमल आणि तिचे पती धिरज दोघांनी “कोमल न्यू लाईफ फाउंडेशन” या संस्थेची स्थापना केली होती, त्यामार्फत त्यांनी ऑर्गन डोनेशन साठी खूप मोठं काम केलं तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती केली. स्वभावाने अत्यंत प्रेमळ, मनमिळावू, हसतमुख अश्या कोमल ला “सातारा” नेहमी स्मरणात ठेवेल. माझ्या अगदी लहान बहिणी प्रमाणे असलेल्या कोमलला भावपूर्ण श्रद्धांजली

कोण होत्या कोमल पवार?
फलटण तालुक्यातील तरडफ येथील धीरज विलास गोडसे यांच्याशी साताऱ्यातील कोमल पवार हिचा विवाह झाला होता. ती लग्नानंतर अवघ्या एक वर्षांतच आजारी पडली. सातारा, पुणे, मुंबई, बेंगलोर येथे तिच्यावर उपचार करण्यात आले. पण तिचा आजार दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत असल्यामुळे डॉक्टरांनी हृदय आणि फुफूस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणासाठी उपलब्ध झाले, पण केवळ पैशांअभावी उपचार थांबले होते. या शस्त्रक्रियेसाठी केवळ दवाखान्याचा खर्च ३५ लाख तर एकूण खर्च ५४ लाखांच्या घरात जाणार होता. पण संपूर्ण सातारकर आणि समाजसेवी संस्थांच्या मदतीने कोमलवर यशस्वी उपचार पार पडले. कोमलने तेव्हा प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूला मात दिली होती.

तिला केवळ अवयवदानामुळे पुनर्जन्म मिळाला होता. ही किमया अवयवदानामुळे साध्य झाली. शरीरातील एकेका अवयवांचे कार्य वेगळे जगण्याचा आनंद देणारे असते. अवयवाचे महत्त्व आगळे असते, स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठीही! हेच या घटनेने सिद्ध केल्यानंतर अवयवदानाचे महत्त्व पटविण्यासाठी कोमल आणि तिच्या पतीने आपल्या फाउंडेशनमार्फत जागृती करीत अशा गरजू रुग्णांना मदत करण्याची भूमिका घेतली होती.