काही वर्षांपूर्वी पक्षात आलेले नेते आता निघाले आम्हाला अक्कल शिकवायला – एकनाथ खडसे


जळगाव: पुन्हा एकदा स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता आपल्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताा भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी हल्लाबोल केला आहे. पक्षात दहा-पंधरा वर्षांपूर्वी उदयास आलेले नेते आम्हाला आता अक्कल शिकवायला लागले असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता खडसेंनी निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मी पुन्हा येईन, अशी घोषणा दिली होती. खडसेंनी त्यावरूनही फडणवीस यांना टोला लगावला. जनतेला मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार हे आवडले की नाही याचा आता मी शोध घेणार असल्याचे म्हणत फडणवीस यांना नाव न घेता खडसेंनी लक्ष्य केले.

गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी एकेकाळी पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही अतिशय कष्ट घेऊन पक्ष उभारणी केली होती. मागच्या वेळेस तर युती नसतानाही राज्यात एक हाती सत्ता मिळाली होती. केंद्रात आता आपले सरकार आहे. राज्यात अनुकूल परिस्थिती होती. पण या अशा नेत्यांमुळे सर्व वातावरण अनुकूल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागल्याचे म्हणत खडसेंनी स्वपक्षातील काही नेत्यांना लक्ष्य केले.

माझ्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना असल्याचे खडसे म्हणाले. गेली चाळीस वर्षे मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. पण पक्षाने तरीही माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. कधी तरी त्याचा स्फोट होऊ शकतो, असे मला वाटते. भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारे कार्यकर्ते आहेत. कोरोनाचे सावट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार आहे. राज्यातील अनेक पक्षांनी मला त्यांच्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते. पण ज्या पक्षाशी गेली चाळीस वर्षे मी एकनिष्ठ राहिलो, त्या पक्षाला सोडून जावे, असा कधीही मनात विचार आला नसल्याचे खडसे म्हणाले.

लवकरच राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असे भाकीत भाजपचे खासदार नारायण राणेंसह यांच्यासह अनेक जण व्यक्त करतात. खडसेंनी त्यावरही भाष्य केले. सध्याच्या आघाडी सरकारचा विचार केला तर अजून एक दीड वर्ष उलथापालथ होईल, असे वाटत नाही. आवश्यक संख्याबळ आघाडी सरकारकडे आहे. जर भाजपला सत्तेत यायचे असेल तर काही आमदार फोडून चालणार नाही, तर एखादा पूर्ण पक्ष भाजपमध्ये यायला हवा. पण ही भाबडी आशा आहे, सध्या तरी असे काही होईल अशी परिस्थिती नसल्याचे खडसे म्हणाले.