वंचित बहुजन आघाडी आणि वारकऱ्यांचे मंदिरे खुली करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन


पंढरपूर : आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मंदिरे खुली करण्यासाठी आज पंढरपुरात आंदोलन करणार असून आज सकाळी कार्यकर्त्यांनी सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडले. तर प्रकाश आंबेडकर आंदोलनासाठी सोलापूरहून पंढरपूरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत चार गाड्यांचा ताफा असून त्यात कार्यकर्ते आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान होईल, त्यांनंतर पुंडलिक दर्शन करुन प्रकाश आंबेडकर हे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील. 200 पेक्षा जास्त संघटनाचा या आंदोलनला पाठिंबा असल्याची माहिती देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली.

वारकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे मोजकेच कार्यकर्ते पोलिसांच्या नाकाबंदीमुळे पंढरपूरमध्ये दाखल झाल्याने एक लाख वारकऱ्यांची घोषणा हवेतच विरणार आहे. काल काहीवेळ माळीनगर येथे थांबून प्रकाश आंबेडकर सोलापूरला मुक्कामाला गेले होते. काल त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी चर्चा केली होती.

मोजक्या कार्यकर्त्यांसह नामदेव पायरीजवळ भजन करण्याची परवानगी द्यावी किंवा मोजक्या वारकऱ्यांसह मंदिरात सोडण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री पातळीवर आता यावर विचार सुरु आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना मोजक्या वारकऱ्यांसह विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे

गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. पण वारकरी संघटनांमार्फत भजन-कीर्तनासाठी मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याच मागणीला पुढे नेत विठ्ठल मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी केली. 31 ऑगस्ट रोजी त्यासाठी पंढरपुरात 1 लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा दिला. अद्याप कोणताही तोडगा शासनातर्फे निघालेला नाही. त्यामुळे आज पंढरपुरात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन होणार आहे.

याआधी आंबेडकरांनी 12 ऑगस्ट रोजी राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करण्यासाठी ‘डफली बजाओ’ आंदोलन केले होते. नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानक चौकात आंबेडकरांनी या आंदोलनात स्वत: डफली वाजवत सहभाग नोंदवला. तर लॉकडाऊनमुळे अनेकांची उपासमार होत असल्याचे म्हणत नाभिक समाज आणि इतर श्रमिकांच्या मागण्यांसाठी देखील वंचिततर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीत भरमसाठ वीजबिले पाठवण्यात आली आहेत, ही बिले सरसकट माफ करण्यात यावी यासाठी देखील वंचिततर्फे आंदोलन करण्यात आले आहे.