फॉलोअर्स हजारोंच्या संख्येने अनफॉलो करत असल्यामुळे कंगना राणावत त्रस्त


आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावत ओळखली जाती. बॉलीवूडमधील घराणेशाही, कंपूशाही, ड्रग्स रॅकेट, नव्या कलाकारांवर होणारा अन्याय या विरोधात गेल्या काही काळापासून ती सातत्याने आवाज उठवत आहे. तिच्या या रोखठोक शैलीमुळेच लाखो नेटकरी तिला ट्विटवर फॉलो करु लागले. परंतु गेल्या काही दिवसांपासून अचानक तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले आहेत. या विशेष बाब म्हणजे तिला एका दिवसात सरासरी ४० ते ५० हजार फॉलोअर्स अनफॉलो करु लागले आहेत.

याकडे ट्विटर इंडियाने लक्ष द्यावे, अशी विनंती कंगनाने स्वत: ट्विट करुन केली आहे. गेल्या काही काळात सातत्याने माझे ट्विटर फॉलोअर्स कमी होत आहेत. यामध्ये एक पॅटर्न असल्याचा संशय मला येत आहे. ४० ते ५० हजार फॉलोअर्स दिवसाला कमी होत आहेत. ट्विटरवर मी नवीन आहे. यामागील कारण मला माहित नाही. हे असे का होत असल्याचे कोणी मला सांगेल का? अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे. तिने ट्विटर इंडियाला देखील हे ट्विट टॅग केले आहे. सध्या सोशल मीडियावर कंगनाचे हे ट्विट चर्चेत आहे.

सध्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर कंगना सातत्याने भाष्य करत आहे. याचदरम्यान तिने रिपब्लिक टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला. ती म्हणाली, रिया चक्रवर्ती ही नक्कीच खोटे बोलत आहे. तिने आधी सीबीआय चौकशी करा अशी मागणी केल्यानंतर अचानक सीबीआयने चौकशी करु नये अशा आशयाची याचिका न्यायालयात दाखल केली. सुशांतला ड्रग्स वगैरे तिनेच दिले आहेत. पण एवढे मोठे कारस्थान ती एकटी करु शकत नाही. नक्कीच कोणीतरी मास्टर माईंड तिच्या मागे आहे. कदाचित हे केवळ पैशांसाठी रियाने केले असेल. आपल्याला रियासोबत त्या मास्टर माईंडचे पितळ देखील उघडे पाडायचे आहे.