
नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, केंद्र सरकारने आता 30 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सेवा बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान केंद्र सरकारने काही तासांपूर्वीच अनलॉक 4 ची नियमावली जारी केली आहे. त्यानुसार अद्याप नियमित विमानसेवा सुरू करण्यात आलेली नाही. दरम्यान डीसीजीएकडून देण्यात आलेली कार्गो विमानांसाठी सेवा सुरू राहील तसेच इतर मार्गांवर परवानगी देण्यात आलेल्या विमानसेवा कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
30 सप्टेंबरपर्यंत सुरु होणार नाही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक
केंद्र सरकारकडून परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी वंदे भारत मोहिम सुरू करण्यात आली आहे. तसेच अमेरिका, युके, युएईमध्ये एअर बबलच्या माध्यमातून खबरदारी घेत प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच काही परदेशी पत्रकारांना आता भारतामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पण उर्वरित ठिकाणी अद्यापही विमानसेवा सुरळीत सुरू करण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
दरम्यान प्रवाशांना कोरोना संकटकाळातही कार्गोच्या माध्यमातून वस्तू, औषधे आणि अन्य सामान पाठवण्याची सोय खुली होती, ती कायम ठेवण्यात आली आहे. तर अन्य काही मार्गांवर केंद्र सरकार एअर इंडिया आणि अन्य खाजगी विमान वाहतूक कंपन्यांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. ती वाहतूक कायम ठेवली जाणार आहे.
