सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झडप


नवी दिल्ली – सीमेवर भारत-चीनमध्ये असलेला तनाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न होत असतानाच चीनकडून सीमेवर सुरु असलेल्या कुरापती कायमच आहेत. त्यातच २९-३० ऑगस्टच्या रात्री सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झडप झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काही मुद्द्यांवर भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये सहमती झाली होती. चीनकडून त्यांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली आहे. यासंदर्भातभारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, आधी ठरलेल्या एकमताचे चीनच्या सैनिकांनी उल्लंघन केले आणि पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशाचे सैनिक पँगोंग लेक परिसरात 29-30 ऑगस्टच्या रात्री आमने-सामने आले होते. पण भारतीय लष्कराने प्रतिकार करत पँगोंग आणि Tso Lake परिसरात चीनच्या सैनिकांना घुसखोरीपासून रोखले.