आरबीआयच्या अहवालात खुलासा; सॅनिटाईज केल्यामुळे 2 हजारांच्या 17 कोटींच्या नोटा खराब


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारकडून मास्क वापरणे, सोशल डिस्टेंसिंग त्याचबरोबर वेळोवेळी हात सॅनिटाईज करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण या सुचनांना देशातील नागरिकांनी जास्तच मनावर घेतल्याचे चित्र आरबीआयने नुकत्याच जाहिर केलेल्या अहवालामुळे समोर आले आहे.

कोरोनाच्या संकट काळात भारतीय चलनातील सर्वाधिक नोटा खराब झाल्या आहेत. कारण या नोटांना देशातील नागरिकांनी सॅनिटाईज केले, त्याचबरोबर काहींनी तर धुवून वाळवल्या देखील आहेत. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) येणाऱ्या खराब नोटांच्या संख्येने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, १७ कोटी रुपयांच्या यावर्षी दोन हजारांच्या नोटा खराब झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या ३०० पट जास्त असून यात २०० रुपयांच्या नोटा दुसऱ्या स्थानी आहेत. तर ५०० रुपयांच्या नोटा तिसऱ्या स्थानी आहेत. सर्व नोटा खराब होण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढले आहे.

लोकांना चलनामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वाटत असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच अनेक अहवाल आल्यानंतर लोकांनी चलन सॅनिटाईज करण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या संकट काळात सुरुवातीला लोकांनी नोटा धुतल्यानंतर अनेक तास नोटा उन्हात वाळत घातल्या. बँकांमधूनही नोटावर सॅनिटाईज करण्यात येत होते. परिणामी जुन्या तर झाल्याच, पण नव्या नोटाही वर्षभरात खराब झाल्या. आरबीआयने जारी केलेल्या अहवालात स्पष्ट होते की, दहा रुपयांपासून दोन हजारांपर्यंतच्या नोटा प्रथमच मोठ्या संख्येने खराब झाल्या आहेत. दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद झाली आहे. गेल्या वर्षी दोन हजारांच्या ६ लाख नोटा आरबीआयकडे बदलण्यास आल्या. यावर्षी ही संख्या १७ कोटींपेक्षाही जास्त आहे.

आरबीआयने दिलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी एक रुपयाच्या दोनशे कोटी रुपयांच्या नाण्यांची मागणी होती. या वर्षी त्यात घट होऊन फक्त १२ कोटी रुपयांची मागणी आली. म्हणजे ९५ टक्के लोकांनी एक रुपयाची नाणी स्वीकारणे बंद केले. दहा रुपयाच्या नाण्यांनाही कंटाळले. गेल्या वर्षी दहा रुपयांची २०० कोटी रुपयांच्या नाण्यांची मागणी होती. परंतु यावर्षी केवळ १२० कोटी रुपयांच्या नाण्यांची मागणी होती.