मोदींनी खेळण्यांऐवजी परीक्षांवर ‘मन की बात’ केली असती तर बरे झाले असते – राहुल गांधी


नवी दिल्ली – आज मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशभरातील नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. नरेंद्र मोदींनी यावेळी कोरोना, शेतकरी, खेळणी उद्योग आदी विविध मुद्यांवर भाष्य केले. पण देशातील राजकारण सध्या ज्या गोष्टीवरून तापले आहे त्या जेईई व नीट या परीक्षांच्या संदर्भात कोणतेच भाष्य केले नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावरून पंतप्रधान मोदींवर ट्विट करत निशाणा साधला आहे.

‘परीक्षेवर चर्चा’ पंतप्रधानांनी करावी असे ‘जेईई-नीट’च्या परीक्षार्थींना वाटत होते. पण पंतप्रधानांनी ‘खेळण्यांवर चर्चा’ केल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’द्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधतना, खेळणी उद्योगावर भाष्य केले. खेळणी उद्योगातील प्रमुख ठिकाण भारताला बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, खेळण्यांसाठी आता सर्वांनी व्होकल होण्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले.

नीट आणि जेईई परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि त्यांनी सहमती दर्शवल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा, असा सल्ला केंद्र सरकारला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या अगोदर दिलेला आहे. सर्व पक्षांशी चर्चा करत सरकारने उपाय शोधला पाहिजे असे देखील मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले होते. तसेच, तुम्ही आधीच करायचे तेवढे नुकसान केले आहे. आता तरी देशातील विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐका अशी विनंतीही त्यांनी सरकारला केली होती.

तर, कोरोनाचा देशासह अनेक राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत असून, परीक्षा अशा परिस्थितीत घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो, अशी भूमिका घेत विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्य सरकारांनी नीट व जेईई परीक्षा घेण्यास विरोध केलेला आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी या राज्यांनी केली आहे. तसेच, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे.