सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. एक गट असा आहे, जो सुशांतने आत्महत्या नाही, तर त्याची हत्या झाली आहे, असे मानतो. यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या नसून, हत्या असण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
माझ्या मते सुशांतची आत्महत्या नसून हत्याच असावी – रामदास आठवले
रामदास आठवले म्हणाले की, सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाला न्याय हवा आहे आणि सीबीआय तपासाने ते संतुष्ट आहेत. रामदास आठवले यांनी आज फरिदाबाद, हरियाणा येथे सुशांतचे वडील केके सिंह आणि त्याची बहीण राणी सिंह यांची भेट घेतली.
यावेळी रिया चक्रवर्तीविषयी विचारलेल्या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले की, सुशांतच्या हत्येमागे तिचा हात असण्याची शक्यता आहे. हत्या असो अथवा आत्महत्या, न्याय मिळायला हवा. हत्या झाली की कोणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले हे तपासानंतर समोर येईलच.
