१ सप्टेंबरपासून अनलॉकच्या चौथ्या टप्प्यासह होणार ‘हे’ बदल


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील पाच महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आला होता. पण आता हा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे. आतापर्यंत देशात अनलॉकचे तीन टप्पे झाले असून एक सप्टेंबर देशात अनलॉकच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यापासून अनेक महत्वपूर्ण बदल देखील होणार आहेत. याची झळ सर्वसामान्य नागरिकांना सोसावी लागणार आहे. अनेक महत्वाचे बदल ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला देखील झाले होते. एक सप्टेंबरपासून होणाऱ्या बदलाबाबतचे संकेत सरकारने नुकतेच दिले आहेत. एलपीजी सिलिंडर, महागडी विमान यात्रा, अनलॉक ४ ची सुरुवात, लोन मोरेटोरियम आणि जीएसटी भरणाशी निगडित आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये १ सप्टेंबरपासून वाढ होण्याची शक्यता असून एलपीजीच्या किंमतीत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला बदल होतो. असाच बदल ऑगस्ट महिन्यातही झाला होता.

त्याचबरोबर एक सप्टेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून अधिक विमानन सुरक्षा शुल्क (एएसएफ) घेण्याचा निर्णय नागरी उड्डान मंत्रालयाने घेतल्यामुळे विमानप्रवास देखील महागण्याची शक्यता आहे.

देशात अनलॉकचा पुढील टप्पा केंद्र सरकार १ सप्टेंबरपासून राबवणार आहे. यामध्ये अनेक गोष्टींना सूट मिळण्याची शक्यता आहे. अनलॉक ४ ची नियमावली पुढील दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यांना मेट्रो ट्रेन सुरु करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसेच अनेक गोष्टी सुरु होण्याची शक्यता आहे.

जीएसटी भरणा उशीराने करणाऱ्यांना एक सप्टेंबरपासून व्याज द्यावे लागणार असल्याची घोषणा नुकतीच सरकारकडून करण्यात आली आहे.