दोन ठग वकिलांनी विकायला काढले होते संपूर्ण महाबळेश्वरच


सातारा – साताऱ्यातील नामांकित वकील व त्याच्या मित्राने ‘जमीन नावावर करून देतो,’ असे आमिष दाखवून पुण्यातील उद्योगपतीला २५ लाखांना लुबाडल्याची धक्कादायक बाब समोर आली असून उद्योजक वैभव लक्ष्मण गिरी (वय ५४, रा. वारजे पुणे) यांनी याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

साताऱ्यातील वकील रविराज गजानन जोशी आणि त्यांचे पुण्यातील सहकारी सुहास लक्ष्मण वाकडे यांनी दिवंगत दत्तो पिंगळे यांना इनामात मिळालेली ४८७५ एकर व २५ आर जमीन त्यांच्या वारसाकडून मिळवून देण्याचा बहाणा केला होता. विशेष म्हणजे हे क्षेत्र संपूर्ण महाबळेश्वरचे आहे. या ४८७५ एकर व २५ आर जमिनीच्या परिसरात महाबळेश्वर, लिंगमळा, प्रतापगड, वेण्णा लेक, ऑर्थरसीट पॉर्इंट आदीचा समावेश होत असून वैभव गिरी हे वकिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पुढील व्यवहारासाठी तयार झाले.

अ‍ॅड. जोशी यांनी त्यानंतर वाकडे यांच्या पुण्यातील घरात देण्याघेण्याचा व्यवहार ठरवला. जमीन खरेदी व्यवहारापोटी नोव्हेंबर, डिसेंबर २०१९ या काळात गिरी व माधवी ओतारी यांनी ५ लाख रुपये वकिलांना दिले. त्याचबरोबर जानेवारी २०२० मध्ये पुण्यात झालेल्या व्यवहाराची नोटरी करण्यात आली. चार लाख रुपये रोख व सहा लाख रुपये बँकेतून त्यावेळी वर्ग करण्यात आले होते. संबंधितांना आतापर्यंत एकूण २५ लाख रुपये देण्यात आले. पण मिळकतीचा ताबा देण्याची मागणी केल्यावर अ‍ॅड. जोशी व वाकडे यांनी टाळाटाळ केली आणि त्यांचे बिंग फुटले. या सर्व प्रकाराने व्यथित झालेल्या गिरी यांनी पोलिसांत धाव घेऊन या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.