मुंबईकरांवरील पाणीकपातीचे विघ्न टळले


मुंबई – मुंबईकरांवर यंदा महिन्याभरापूर्वी अवघा 34 टक्केच पाणी साठा असल्यामुळे पाणी कपातीचे संकट घोंघावत होते. पण या महिन्यात धरण क्षेत्र आणि तलावांमध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी कपातीमधून मुक्त केले आहे.

5 ऑगस्ट पासून असणारी 20% पाणी कपात 21 ऑगस्टला कमी करून 10% करण्यात आली होती. ही 10% पाणी कपात देखील आता 29 ऑगस्ट पासून पूर्ण रद्द करण्यात आल्यामुळे एकीकडे कोरोनाशी झुंजणार्‍या मुंबईकरांवरून पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे. दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलावे 95% पेक्षा अधिक भरल्यामुळे मुंबईकरांवर ओढावणारी पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

तानसा, भातसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा, मोडक सागर आणि अप्पर वैतरणा या सात तलावांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान यापैकी तुळशी, विहार, मोडक आणि तानसा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. तर उर्वरित तलावे देखील पूर्ण भरण्याच्या तयारीत असल्यामुळे यंदा पाणी पुरवठा नियामित सुरू राहणार आहे. मुंबईला सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी तलावांमध्ये 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर पाण्याचा साठा आवश्यक असतो.

मागील 5-6 दिवसांपासून मुंबईमध्ये दडी मारलेला पाऊस आता पुन्हा परतला आहे. कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रामध्ये निर्माण झाल्यामुळे पुढील 2-3 दिवस मुंबईत मुसळधार पावसाचे राहणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रात यंदा ऑगस्ट महिन्यात 50% अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.