सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली बिहार विधानसभा निवडणुका थांबवण्याची याचिका


नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेची निवडणूक लांबणीवर टाकण्याची इतर राजकीय पक्षांची मागणी फेटाळली असून बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक ठरलेल्या वेळेनुसारच घेतली जाईल, याचा पुनरुच्चार करताना निवडणूक आयोग कोरोनाची परिस्थिती नजरेसमोर ठेवून तयारी करीत आहे व ती करताना आवश्यक ती खबरदारीही घेत असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले होते. त्यानंतर, आता बिहार विधानसभा निवडणूक थांबवता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही आता स्पष्ट केले आहे.

यावर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पण काही राजकीय पक्षांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने बिहार विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बिहारमधील निवडणुका थांबवता येणार नाहीत. तसेच, निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत दखलही देता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोग जोपर्यंत याबाबत काही अधिसूचना जारी करत नाही, तोपर्यंत यामध्ये न्यायालयामार्फत हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाकडून सावधानता बाळगतच पाऊल उचलेल. त्यामुळे ही याचिका प्रीमॅच्यूअर असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

विधानसभेची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी आयोगाकडे बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि लोकजनशक्ती पक्षासह इतर राजकीय पक्षांनी केली होती. निवडणूक याच वेळी घेऊन लक्षावधी लोकांचे जीवित धोक्यात घालणे योग्य ठरणार नसल्याचे आयोगाला लिहिलेल्या पत्रात लोकजनशक्ती पक्षाने म्हटले होते. दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधारी जेडीएस-भाजप, काँग्रेस आणि राजद हे प्रमुख पक्ष रिंगणात असतील.