काँग्रेसच्या नेत्याचा इशारा; तर चव्हाण, देवरा आणि वासनिक यांना राज्यात फिरु देणार नाही


मुंबई – काँग्रेस पक्षामध्ये सध्या नेतृत्वाच्या मुद्यावरुन दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना काही ज्येष्ठ नेत्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी करणारे पत्र पाठवल्यानंतर गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेले निष्ठावान नेते सक्रिय झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त त्यांनी करत राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे.

सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रामध्ये राज्यातील ज्या नेत्यांची नावे आहेत, त्यांच्यावर अत्यंत कडवट शब्दात महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आणि दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी टीका केली आहे. पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे केली आहे. यात महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा या नेत्यांची नावे आहेत.

आदरणीय सोनिया गांधीजी यांना काँग्रेस अध्यक्ष म्हणून माझा मन:पूर्वक पाठिंबा आहे. गांधी परिवाराच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. या नेत्यांनी आपल्या कृतीबद्दल तात्काळ माफी मागितली पाहिजे, असे आपल्या ट्विटमध्ये सुनिल केदार यांनी म्हटले आहे.

माफी मागितली नाही तर या नेत्यांना काँग्रेस कार्यकर्ते राज्यात मुक्तपणे फिरु देणार नाहीत. गांधी अध्यक्षपदावर असतील तरच काँग्रेस पक्ष भाजपविरोधात लढू शकतो. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाच्यामागे भक्कमपणे उभे राहण्याची ही वेळ असल्याचे सुनिल केदार यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.