पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आदित्य ठाकरे यांचे पत्र


मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देश संकटात असतानाच या महामारीचा प्रसार अजून होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यातच देशभरातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसोबतच विविध अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांचा मुद्दा गाजत आहे. विद्यार्थ्यांकडून कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. तर परीक्षा रद्द करण्याची मागणी काही जणांकडून केली जात आहे. युवा सेनेचे नेते व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्व परीक्षांच्या प्रश्नांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे.

परीक्षांचा मुद्दा सध्या राज्यात आणि देशात गाजत आहे. सर्वोच्च न्यायालयात विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. युवा सेनेचे नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाचा निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

कोरोनाविरूद्ध आपल्या नेतृत्वाखाली देश लढा देत आहे. नागरिकही यात मोठ्या प्रामाणिकपणे आपले योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे देशातील बहुतांश नागरिक वर्क फ्रॉम होमलाच प्राधान्य देत आहेत. अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठ, व्यावसायिक व अव्यासायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याचे ठरवत आहेत. पण, जगभरात जिथे कुठे शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली, तिथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. केवळ विद्यार्थ्यांशी संबंधित हा विषय नाही, त्यांच्या कुटुंबिय आणि शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचाही असल्यामुळे माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, या विषयात हस्तक्षेप करून सर्व शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावे. त्याचबरोबर आपले शैक्षणिक वर्ष जून-जुलै २०२० ऐवजी जानेवारी २०२१ पासून सुरू करावे, ज्यामुळे कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. विविध शाखांच्या परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका असल्यामुळे या प्रकरणात पंतप्रधानांनी स्वत: हस्तक्षेप करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.