राम मंदिराच्या बांधकामात लोखंड ऐवजी होणार तांब्याच्या पट्ट्यांचा वापर


नवी दिल्ली : अयोध्येत तयार होत असलेले ऐतिहासिक राम मंदिर पुढची किमान हजार वर्षे भूकंप, वादळ यापासून सुरक्षित राहील अशा पद्धतीने बनवण्याचा मानस असून त्याकरिता मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा वापर केला जाणार नसल्याचे मंदिर ट्रस्टने म्हटले आहे. भूमिपूजनाच्या सोहळ्यानंतर मंदिराच्या कामाची पुढची लगबग सुरु झाली आहे. मंदिर ट्रस्टची एक महत्वाची बैठक आज राजधानी दिल्लीत पार पडल्यानंतर काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

हे मंदिर भारताच्या प्राचीन बांधकाम शैलीचा वापर करुन उभारले जाणार आहे, जेणेकरुन ते अधिक वर्षे मजबुतीने टिकेल, असे ट्रस्टचे सचिव चंपतराय यांनी म्हटले आहे. या बांधकामाची जबाबदारी एल अँड टी कंपनीकडे असून एल अँड टीचे इंजिनीअर हे सध्या आयआयटी चेन्नईच्या काही संशोधकांसह माती परीक्षणाचे काम सुरु करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मंदिर कधीपर्यंत पूर्ण होणार याचीही चर्चा सुरु झाली आहे. मंदिर ट्रस्टचे सचिव चंपतराय यांनी त्याबाबत सांगितले की, 36 ते 40 महिन्यांचा कालावधी बांधकाम पूर्ण होण्यास लागू शकतो. त्यांच्या या वक्तव्यावरुन या मंदिराचे काम साधारणपणे 2024 च्या निवडणुकांच्या आधी पूर्ण होऊ शकते, असेच चित्र सध्यातरी दिसत आहे.

तांब्याच्या प्लेटचाही वापर या मंदिराच्या बांधकामात केला जाणार आहे. 18 इंच लांब, 3 मिलीमीटर जाडी आणि 30 मिलीमीटर रुंद अशा 10 हजार तांब्याच्या प्लेटची आवश्यकता या कामात भासणार आहे. त्यामुळे याच मापाच्या तांब्याच्या प्लेट लोकांनी दान कराव्यात, असेही आवाहन ट्रस्टने रामभक्तांना केले आहे. या तांब्याच्या पट्ट्यांवर दान करणारे आपल्या परिवाराचे, क्षेत्राचे किंवा परिसरातील मंदिराचे नावही कोरुन पाठवू शकतात. देशभरातून अशा ताम्रपटया एकत्रित झाल्यास ते भारताच्या एकात्मतेचंही वेगळं उदाहरण ठरेल, असे ट्रस्टने म्हटले आहे. शिवाय त्यानिमित्ताने संपूर्ण राष्ट्राचं योगदान मंदिर निर्मितीच्या कामात दिले जाऊ शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.