स्वच्छता सर्वेक्षण यादीत सलग चौथ्यांदा इंदूर अव्वल स्थानी, तर नवी मुंबई तिसऱ्या स्थानी


नवी दिल्ली : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून सलग चौथ्यांदा मध्य प्रदेशातील इंदूर शहर असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत गुजरातमधील सूरत शहर दुसऱ्या क्रमांकावर, महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. एक लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या कॅटगरीमध्ये स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरची निवड करण्यात आली आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’मध्ये स्वच्छ शहरांची नरेंद्र मोदींनी घोषणा केली आहे. या दरम्यान स्वच्छतेसाठी उत्तम उपाययोजना करणाऱ्या शहरांचाही गौरव करण्यात आला आहे.

यासंदर्भात बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, इंदूरचा स्वच्छता हा स्वभावच आहे. अस्वच्छेतेला इंदूरच्या जनतेने पळवून लावले आहे आणि इंदूरची स्वच्छता ही सभ्यता बनली आहे. इंदूरच्या जनतेला मी शुभेच्छा देतो. आता केवळ देशातीलच नाही तर जगभरातील लोक स्वच्छतेची शिकवण घेण्यासाठी कुठे येत असतील तर इंदूरमध्येच येतील.

स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात देशातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी करण्यात आली. गेल्या 28 दिवसांत स्वच्छ सर्वेक्षण 2020 पूर्ण करण्यात आले आहे. गुरुवारी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छ महोत्सवामध्ये स्वच्छता सर्वेक्षण रिपोर्टव्यतिरिक्त स्वच्छ सर्वेक्षण इनोवेशन, स्वच्छ सर्वेक्षण सोशल मीडिया आणि गंगा किनाऱ्यावर वसलेल्या शहरांचाही अहवाल शेअर करण्यात आला. वाराणसी शहराला यामध्ये बेस्ट गंगा टाऊन हा किताब देण्यात आला.

म्हैसूरला स्वच्छता सर्वेक्षणाच्या पहिल्या आवृत्तीत भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळाला होता. त्यानंतर सलग तीन वर्ष 2017, 2018 आणि 2019मध्ये मध्यप्रदेशातील इंदूर शहराला सर्वात स्वच्छ शहराचा मान देण्यात आला होता. तसेच यावर्षीही सलग चौथ्यांदा इंदूरने हा मान पटकावला आहे.