मागील 4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोक बेरोजगार, तर 2 कोटी कुटुंबांचे भविष्य अंधारात


नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोरोना, लॉकडाऊन, भारत-चीनमध्ये असलेला तणाव अशा विविध मुद्द्यांवरून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून टीकास्त्र सोडत आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले असून त्यावरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी मागील 4 महिन्यांत 2 कोटी लोक बेरोजगार, 2 कोटी कुटुंबांचे भविष्य अंधारात, असे म्हणत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या सर्वनाशाचे सत्य फेसबुकवर खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवून देशापासून लपवता येत नसल्याचे देखील राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

याबाबतचे एक ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच यासोबतच एक बातमीही पोस्ट केली आहे. बातमीत एप्रिल 2020 पासून ते आतापर्यंत 1 कोटी 89 लाख नोकऱ्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी नोकरी हिसकावली, जमवलेले पैसेही लुबाडले, आजाराचा संसर्ग रोखू शकले नाही, तरी देखील जनतेला ते खोटी स्वप्न दाखवत राहिले, अशा आशयाचे ट्विट केले होते. पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन मसुद्यावरून (EIA2020) देखील राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

देशाला लुटण्याचा EIA2020 उद्देशच असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. भाजप देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी काय करत आली याचे आणखी एक भयंकर उदाहरण, असे देखील त्यांनी याआधी म्हटले होते. तसेच यासोबतच LootOfTheNation हा हॅशटॅग देखील राहुल गांधी यांनी वापरला होता.