संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे डॉक्टरांची मार्ड संघटना नाराज


मुंबई : डॉक्टर्सच्या बाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मार्ड संघटनेने आपली नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मार्ड संघटनेने पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी मी कधी डॉक्टरांकडून औषधं घेत नाही, मी कंपाऊंडरकडून औषधे घेतो, असे वक्तव्य केले होते. यावर ‘आपली सुद्धा हीच अधिकृत भूमिका आहे असे ग्राह्य धरावे का?’ असा प्रश्न मार्ड संघटनेने पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मार्डने म्हटले आहे की, एकीकडे डॉक्टर्स कोरोना योद्धा आहेत, असे वारंवार मुख्यमंत्री म्हणतात तर त्यांचेच सहकारी असलेले संजय राऊत अशा प्रकारची वल्गना करत आहेत. डॉक्टरांना काय कळते? हे ऐकवून दाखवत असताना याचा अर्थ काय घ्यायचा? असा प्रश्न विचारला आहे. आम्ही मागील अनेक महिन्यांपासून रात्रंदिवस जीवाची बाजी लावून काम करत आहोत. अनेकांनी कित्येक दिवस आपले घर अथवा कुटुंबियांचे तोंड बघितलेले नाही. अनेक डॉक्टर्स मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. ते फक्त हेच ऐकण्यासाठी की ‘डॉक्टरांना काय कळते’? असा सवाल मार्डने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

जे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे, ते राज्यातील तरुण डॉक्टर्सचे खच्चीकरण करणारे असून आपली सुद्धा ही भूमिका ग्राह्य धरावी का? असा सवाल केला आहे. जर असे नसेल तर संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करून, आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे आणि तसे होत नसेल तर ही आपली देखील हीच अधिकृत भूमिका असल्याचे समजून तरुण डॉक्टर्स याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील मार्डने दिला आहे.

खासदार संजय राऊत एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेडिकल, औषधांबाबत दांडगा अनुभव आहे. आरोग्यव्यवस्था, यंत्रणा याचा अभ्यास आहे. कारण मुंबई महानगरपालिका त्यांनी अनेक वर्ष सांभाळली आहे. मुंबईत अनेक आजार सतत येत असतात. जागतिक आरोग्य संघटनेला काय कळते? ते सीबीआयसारखे आहे. जागतिक आरोग्य संघटना काय आहे, इकडून तिकडून गोळा केलेली माणसे असल्याचे राऊत म्हणाले. त्यात सगळे डॉक्टर असल्याचे, म्हटल्यानंतर राऊत म्हणाले की, डॉक्टर असले म्हणून काय झाले, मी कधी डॉक्टरांकडून औषधे घेत नाही, मी कंपाऊंडरकडून औषधे घेतो. तुम्ही काय आरोग्य संघटनेचे बसला आहात. त्यांच्या नादी लागलो म्हणून कोरोना एवढा वाढल्याचे राऊत यांनी म्हटले होते.