नवी दिल्ली : भारतात किती वेळा युद्ध झाले आणि देशातील लोकांना स्वातंत्र्य कसे मिळाले, याबद्दलची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. पण त्यांनी या ट्विटच्या माध्यनातूनच आगामी काळात वाद उद्भवू शकणाऱ्या एका युद्धाचा उल्लेख करत हिंदुत्वासाठी युद्ध १६ मे २०१४ पासून सुरू झाले असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसला १६ मे २०१४ ला पहिल्यांदा पराभूत करून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करण्यात आले.
१६ मे २०१४ पासून सुरू झाले हिंदुत्वासाठी युद्ध – सुब्रमण्यम स्वामी
भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध ब्रिटीश साम्राज्यवादासोबत १८५७ मध्ये झाले. दुसरे युद्ध २१ ऑक्टोबर १९४३ रोजी झाले. तर १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशातील छुप्या पश्चिमीकरणापासून स्वातंत्र्याचे तिसरे युद्ध सुरु झाले आणि हिंदुत्वासाठी १६ मे २०१४ रोजी युद्ध सुरू झाल्याचे आपल्या ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
नेहमीच हिंदूंच्या अधिकाराविषयी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हे बोलत असतात. त्यांनी राम मंदिराच्या निर्मितीसाठी मोठा आवाज उठविला होता. तत्पूर्वी हिंदूंचा मूलभूत अधिकार मुस्लिमांच्या संपत्तीच्या अधिकारापेक्षा वरचा आहे, कारण हा साधारण अधिकार असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते. त्याचबरोबर अयोध्येत गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावरुनच राम सेतूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा करावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती.