वॉल स्ट्रीट जर्नलचा भारतातील फेसबुकच्या धोरणाबद्दल खळबळजनक खुलासा


नवी दिल्ली – द वॉल स्ट्रीट जर्नलने भारतात लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या धोरणाबद्दल धक्कादायक खुलासा केला असून द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर कडक कारवाई करणाऱ्या फेसबुकने भाजप नेते आणि त्यांच्याशी संबंधित काही ग्रुपबद्दल नरमाईची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. फेसबुकने व्यावसायिक वृद्धीच्या हेतूमुळे हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाईस नकार दिला आहे.

फेसबुकच्या कारवाई न करण्याबद्दलच्या भूमिकेचा गौप्यस्फोट द वॉल स्ट्रीट जर्नलने केला असून भारतातील फेसबुकच्या वरिष्ठ कार्यकारिणीने सत्ताधारी भाजपशी संबंधित चार नेते आणि ग्रुप यांच्यावर द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट संदर्भात असलेले नियम लागू करण्यास विरोध केला आहे. दुसरीकडे वस्तुस्थिती अशी आहे की, हिंसा भडकावण्यात आणि चिथावणी देण्यात काही नेते आणि ग्रुप सहभागी होते.

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार यासंदर्भातील सूचना फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. कंपनीच्या भारतातील व्यावसायिक वाढीला भाजप नेत्यांच्या हिंसाचार पसरवणाऱ्या पोस्टवर कारवाई केल्यास धोका निर्माण होऊ शकतो, असं दास यांनी कर्मचाऱ्यांना सांगितल्याचे वॉल स्ट्रीटने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. फेसबुक वापरकर्त्यांची संख्या जागतिक पातळीपेक्षा सर्वाधिक भारतात आहे.

भाजपच्या तेलंगानातील आमदार टी. राजा सिंह यांच्या द्वेष पसरवणाऱ्या पोस्टचा उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे. राजा हे अल्पसंख्याकांविरोधात हिंसा करण्याचे या पोस्टमध्ये आवाहन करत आहेत. फेसबुकमध्ये सध्या कार्यरत असलेल्या आणि माजी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणातील अंखी दास यांचा हस्तक्षेप हा कंपनीने सत्ताधारी पक्षाविषयी अनुकूलता दर्शवल्याचा व्यापक स्वरूपाचा भाग आहे.

फेसबुकच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे याबाबत असे मत आहे की, कंपनीच्या धोरणानुसार आमदाराचे खात बंद करण्यात यावे, असे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असे म्हटले आहे. फेसबुकचे प्रवक्ते एंडी स्टोन यांनी यावर भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, राजकीय पडसादांविषयी दास यांनी चिंता व्यक्त केली होती. पण, फेसबुकवर सिंह यांना बंदी न घालण्याची इतरही अनेक कारणे असल्याचे स्टोन यांनी सांगितले. रिपोर्टनुसार फेसबुककडे वॉल स्ट्रीट जर्नलने याबद्दल विचारणा केली असता. फेसबुकने त्यावर सिंह यांच्या पोस्ट डिलीट केल्याचे सांगण्यात आले.