राजस्थानमधील सत्तासंघर्ष शमल्यानंतर अखेर आजपासून विधानसभा सत्राला सुरुवात झाली आहे. सदनाची कार्यवाही काही वेळासाठी स्थगित देखील करण्यात आली होती. मात्र नंतर 1 वाजता कार्यवाही सुरु होताच गेहलोत सरकारचे कायदा आणि संसदीय कार्यमंत्री शांति कुमार धारीवाल यांनी विश्वास प्रस्ताव सादर केला. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेस नेते सचिन पायलट बोलणार असल्याने ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते.
…. म्हणून मला विरोधी पक्षाजवळ बसविण्यात आले – सचिन पायलट
यावेळी बोलताना पायलट म्हणाले की, मला विरोधी पक्षाजवळ यासाठी बसवण्यात आले, कारण सीमेवर सर्वात ताकदवर योद्ध्यालाच पाठवले जाते. आपल्या सीटमध्ये झालेल्या बदलांविषयी ते म्हणाले की, सीमेवर कितीही गोळीबार झाला, मी कवच आणि भाला घेऊन सरकार वाचवण्यासाठी उभा आहे.
विधानसभा सत्र सुरु होताच शांति धारीवाल यांनी विश्वास प्रस्ताव सादर केला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही राजस्थानला गोवा आणि मध्य प्रदेश बनू दिले नाही. त्यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांचा रबर स्टँप असाही उल्लेख केला.