पुणेकरांसाठी खुषखबर; पाणी कपातीचे संकट टळले


पुणे – संततधार पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार ही धरणात १८.६३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून, ६३.९१ टक्के एवढी धरणांची एकूण टक्केवारी झाली आहे. तर त्यापैकी खडकवासला धरण १०० टक्के भरल्यामुळे पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले असल्याचे धरणातील सध्याच्या साठ्यावरून स्पष्ट झाले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाबाबत अधिकारी वर्गासोबत बैठक घेतली होती. पण आगामी गणेशोत्सव लक्षात घेता, सध्या तरी पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

दरम्यान, संततधार पाऊस पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला या चार ही धरणात सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठयामध्ये कमालीची वाढ झाली असून चार ही धरणात मिळून आज सकाळी १८.६३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून ही धरणे ६३.९१ टक्के भरली आहेत.