बिहार पोलिसांचा महाराष्ट्र पोलिसांवर उघडपणे हल्ला दुर्दैवी: उज्जवल निकम


जळगाव : ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्जवल निकम यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर बिहार पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांवर उघडपणे हल्ला चढविला असून ही अतिशय दुर्दैवी गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले आहे. संपूर्ण देशात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर जे काहूर उठले आहे, ते अतिशय चिंताजनक आहे. बिहार पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांवर सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ती आत्महत्या आहे, की त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले की हत्या असा विषय घेऊन ज्या उघडपणे हल्ला चढविला आहे, ते अतिशय दुर्दैवी असून या गोष्टीचे दूरगामी परिणाम पुढील काळात होणार असल्याचे उज्जवल निकम यांनी म्हटले आहे.

उज्जवल निकम पुढे म्हणाले की, एखाद्या गुन्हेगाराला यापुढे लपायचे असेल तर त्याला विदेशात जायची आवश्यकता राहिलेली नाही. कारण जर बिहारमध्ये तो जाऊन लपला तर बिहार पोलीस महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य करणार नाहीत आणि महाराष्ट्रात बिहारचा गुन्हेगार लपला तर त्यांना महाराष्ट्र पोलीस सहकार्य करतील का? असा प्रश्न आता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर निर्माण झाला आहे.

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह मृत्यूनंतर चौकशी सुरू केली. पण त्या चौकशीची फलनिश्पत्ती काय निघाली हे त्यांनी जाहीरपणे उघड न केल्यामुळेच मुंबई पोलिसांवर बिहार पोलिसांनी उघडपणे हल्ला सुरू केला आहे, मुंबई पोलिसांनी याबाबत शांत राहणे पसंत केले आहे, तर बिहार पोलिसांनी यावरून ओरड सुरू केली आहे. ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. कायदा असे सांगतो, गुन्हा ज्या ठिकाणी घडतो, त्या ठिकाणच्या न्यायालयाला तो खटला चालविण्याचा अधिकार आहे. पण ही बाब आज न्याय प्रविष्ट असल्यामुळे त्यावर मी काही बोलणार नसल्याचे निकम म्हणाले.

बिहारचे वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनेबाबत प्रसार माध्यमात येऊन आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यातून महाराष्ट्र पोलिसांच्या बाबत जनतेत संशय निर्माण होईल अशी वक्तव्ये करू लागले आहेत, ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. पोलिसांचे मनोधैर्य या अशा वक्तव्यांमुळे खच्ची होऊ शकते, त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना बिहारच्या राज्यकर्त्यांनी आवर घालावा, असे मत देखील उज्जवल निकम यांनी व्यक्त केले आहे.