अशोक गेहलोत यांनी केलेल्या ‘निकम्मा’ टीकेमुळे आपण दुखावलो – सचिन पायलट


जयपूर – मी सदैवच काँग्रेसचा भाग राहिलेलो असल्यामुळे याला माझे पुनरागमन म्हणत येणार नाही, असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे. पण आमचे जे आक्षेप आणि चिंता राजस्थानमधील सरकारच्या कारभारासंबंधी होती, ती व्यक्त करणे गरजेचे असल्याचे सचिन पायलट यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर ‘निकम्मा’ उल्लेख करत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी टीका केल्यामुळे आपण दुखावल्याचे सचिन पायलट यांनी म्हटले आहे.

नक्कीच मी दुखवलो गेलो. अशा पद्धतीची टीका करण्यापासून मी नेहमी स्वत:ला नेहमी रोखतो. कारण मी काय करतो हे लोकांना माझ्या कामामधून दिसते. मी राजस्थानमध्ये काय काम केले आहे, हे माझे लोक आणि आमदारांनी पाहिले असल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले आहे. त्यांनी अशोक गेहलोत यांच्या निकम्मा टीकेवर बोलताना सांगितले की, कोणाचा कितीही मी विरोध केला तरी अशी भाषा वापरणार नाही. मला तशी शिकवण माझ्या कुटुंबाकडून मिळाली आहे. पण कामासंबंधी एखाद्या गोष्टीवर आक्षेप असेल तर मी तो नोंदवणार.

पुढे ते म्हणाले की, गहलोत माझे वरिष्ठ आहेत. याआधीही आम्ही एकत्र काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची ही माझी पहिली वेळ नसणार आहे. मला लोकांचा किती पाठिंबा आहे याची कल्पना असल्यामुळे पद मोठे असो किंवा छोटे फरक पडत नाही. चर्चा करण्यासारखी स्थिती जयपूरमध्ये अजिबात नव्हती. आम्हाला प्रशासन भीती दाखवत असल्यामुळे राज्याबाहेर जाणे गरजेचे होते. तुम्हाला जेव्हा जीवाची भीती असते, तुमच्या ४५ आमदारांविरोधात गुन्हा दाखल केला जातो, आमच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला…या सर्व गोष्टींमुळेच आम्ही रिसॉर्टमध्ये आश्रय घेतला. आम्ही कोणाकडूनही सुविधा घेत नव्हतो. आमचा खर्च आम्हीच उचलल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले.