चिंताजनक! काल दिवसभरात देशात कोरोनामुळे सर्वाधिक बाधितांचा मृत्यु


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होऊ लागले आहे. त्याच देशातील २२ लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात ६२ हजार ६४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर १००७ जणांनी आपला जीव गमावला असल्यामुळे एका दिवसात एक हजारांहून अधिक मृत्यू झाल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२ लाख १५ हजार ७५ ऐवढी झाली आहे. यात एक दिलासादायक बाब म्हणजे उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण आधिक आहे. देशात सहा लाख ३४ हजार ९४५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १५ लाख ३५ हजार ७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात ४४ हजार ३८६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दूसरीकडे देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहे. त्याचबरोबर दिल्ली, तामिळनाडू, गुजराज, राज्यस्थान आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार ९ ऑगस्ट २०२० रोजी चार लाख ७७ हजार २३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात दोन कोटी ४५ लाख ८३ हजार ५५८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कोरोना चाचण्याचं प्रमाण वाढल्यामुळे देशातील रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.