सुशांतच्या वडिलांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप


मुंबई – सुशांतच्या वडिलांनी पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलीस सुशांतच्या मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शनिवारी सर्वोच्च न्यायालयात मुंबई पोलिसांनी एक प्रतिज्ञा पत्र सादर केले. दरम्यान आता या प्रकरणी काय होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच पोलिसांवर सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी आरोप केला आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी रिया चक्रवर्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला या आशयाचे एक प्रतिज्ञापत्र सुशांतच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या प्रकरणात समावेश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सुशांतच्या वडिलांनी याआधी देखील मुंबई पोलिसांवर इतरही आरोप केले होते. सुशांतच्या जिवाला धोका आहे अशी तक्रार मी फेब्रुवारी महिन्यातच नोंदवल्याचा दावा सुशांतच्या वडिलांनी केला होता. पण अशी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात आता पुन्हा एकदा पोलिसांवर आरोप करत ते रियाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुशांतच्या वडिलांनी म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर या प्रकरणात महाराष्ट्राच्या गृह खात्याने लक्ष घातले आणि पोलिसांनी हा अँगल तपासून पाहण्यासाठी आत्तापर्यंत ४० जणांची चौकशी केली आहे. दरम्यान सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आले आहे. सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीचे सीबीआयच्या आरोपपत्रात नाव आहे. शनिवारी तिची या प्रकरणात चौकशी करण्यात आली. दरम्यान या सगळ्या प्रकरणात रियाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आता सुशांतच्या वडिलांनी केला आहे.