नारायण राणे यांच्याकडे सध्या दूसरा कोणताही उद्योग नाही – गुलाबराव पाटील


मुंबई: भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा पैसा कमावणे हाच धंदा असल्याची टीका केली होती. ८० टक्के लोकांचा नाणारला पाठिंबा असल्याचा दावा स्थानिक शिवसैनिकांनी केल्याचे सांगतिले जात आहे. नारायण राणेंनी त्यावर टीका केली होती. तसेच ज्या दिशेने नाणार प्रकल्पाबाबत स्थानिक जनता जाईल त्या दिशेने आम्ही जाणार असल्याचे स्पष्टीकरणही नारायण राणे यांनी दिले आहे. आता नारायण राणे या वक्तव्यानंतर राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला आहे.

नारायण राणे हे आता सुशुक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांना काही कामधंदा राहिलेला नाही. त्यामुळे ते आधी वेगळं बोलतात, नंतर काही बोलतात. नारायण राणे यांना बोलण्याची टीआरपी वाढवायची असते, त्याशिवाय त्यांच्याकडे दूसरा काही उद्योग राहिलेला नाही. नारायण राणे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे ते काहीही बोलत असतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.

नाणारमधील काही लोकांनी दोन दिवसांपूर्वी नाणार प्रकल्पाचे समर्थन केले. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. शिवसेनेचा पैसे कमावणे हा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. शिवसेनेचे हे घुमजाव आहे. स्थानिक जनतेची ही फसवणूक आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. तसेच नाणारबाबत आपली भूमिका व्यक्त करताना जनता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आम्ही जाणार असल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.