मुंबईकरांनो अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन


मुंबई : मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेला यावेळी त्यांनी अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या. मुंबईत कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून पावसाने आजही मुंबईला झोडपले असून पावसाचा जोर कायम राहील, असे हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

महापालिका, पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.

आजही मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचले असून दृश्यमानता कमी झाली आहे. दादर, हिंदमाता परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी साठायला सुरुवात, दादर ते लालबाग जाणा-या रस्त्यावरील वाहने अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. मुंबईतील हिंदमाता परिसरात जाऊन काल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. 2005 नंतर काल सर्वाधिक अतिवृष्टी झाली आहे. महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर असून त्यांचे काम सुरु असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच गरजेशिवाय बाहेर पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

रात्रभर जोरदार पाऊस वसई विरार नालासोपाऱ्यात सुरु आहे. शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नागीनदास पाडा, तुलिंज, आचोले, विरार पूर्व चंदनसार, पश्चिम विवा कॉलेज रोड, एम बी इस्टेट, वसई पश्चिम समता नगर, पार्वती क्रॉस रोड, सागरशेत, वसई पूर्व नवजीवन, सातीवली परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरु आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे.