भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन


मुंबई : अयोध्येमध्ये आज राममंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे प्रयत्न अयोध्येतील राम मंदिरासाठीची न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पत्र लिहून आपल्या भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, जवळपास 3 दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचे बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांच्या त्यागानंतर हा दिवस उजाडणार आहे. आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची या क्षणी आठवण येते आहे, या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी ट्विट केलेले पत्र

त्याचबरोबर, अवघ्या काही तासांवर स्वप्नपूर्तीचा क्षण येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. राममंदिराचे अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे. अयोध्येत उभे राहणारे राममंदिर हे नेहमीचे मंदिर नाही, ते प्रतिक आहे शतकानुशतके हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचे, अगतिकतेचे, ते प्रतीक आहे कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचे, सहनशीलतेचे आणि म्हणूनच ह्या क्षणाचे महत्व वेगळे आहे, असे म्हटले आहे.

तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक कारसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे प्रयत्न केले, ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

अर्थात ह्या क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता. सध्या कोरोनाचे संकट आहे, पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यावधी भारतीयांनी राममंदिराचे स्वप्न पूर्ण करून दाखवले त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल ह्याची मला खात्री आहे, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.