पुणे शहरात पाणी कपात नाही; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती


पुणे – मागील दोन दिवसांपासुन पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरण परिसरात पाऊस होत असल्यामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता, गणेशोत्सव होईपर्यंत शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नाही. त्याचबरोबर पुढील निर्णय बैठक घेऊन घेतला जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

आज महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहराच्या पाणी नियोजनाबाबत बैठक झाली. महापौर मुरलीधर मोहोळ त्या बैठकीनंतर म्हणाले की, टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चार धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो. आजच्या दिवशी मागील वर्षी ९७ टक्के आणि २८ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. पण यंदा पावसाने शहर आणि धरण क्षेत्रात पाठ फिरवली असल्याने, सध्य स्थितीला धरण क्षेत्रात ३४ टक्के आणि ९ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्या पार्श्वभूमीवर चर्चा देखील केली असून शहर, जिल्ह्यात १५ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतर महिना अखेर पर्यंत १०४ टक्के पाऊस पडण्याची माहिती हवामान विभागामार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासुन धरण क्षेत्रात पडत असलेला पाऊस आणि आगामी गणेशोत्सव लक्षात घेता. पाणी कपातीचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला गेला नाही. पण गणेशोत्सव दरम्यान त्यावेळच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन बैठक घेतली जाईल. त्यानंतर शहराच्या पाणी नियोजनाबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.