…तर अमृता फडणवीस यांनी खुशाल महाराष्ट्र सोडावा


मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांच्या या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांना महाराष्ट्र सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार मागे 5 वर्ष होते. राज्याचे गृहमंत्रीही फडणवीस हे होते. त्यामुळे सरकार बदलले म्हणजे पोलीस बदलले असे होत नाही. पाच वर्ष ज्या पोलिसांची सुरक्षा घेतली, त्या पोलिसांवरच जर संशय घेत असाल तर अमृता फडणवीस यांनी खुशाल राज्य सोडून जावे, असा सणसणीत टोला परब यांनी लगावला आहे.

पोलिसांची गेली 5 वर्ष सुरक्षा घ्यायची आणि त्यांच्यावरच टीका करायची असेल तर त्यांनी राज्य सोडून जाणे हाच योग्य पर्याय आहे. मुंबईत असे काय घडले, ज्यामुळे त्यांना असुरक्षित वाटत आहे? अमृता फडणवीस आजही पोलिसांचीच सुरक्षा घेऊन फिरत असल्याची आठवणही परब यांनी करून दिली.

या प्रकरणात बिहार पोलिसांकडून हस्तक्षेप केला जात आहे, बिहारमधील आगामी निवडणुकीसाठीचे हे राजकारण आहे. खुर्ची मिळवण्यासाठी तडफड दिसून येत असल्याचा टोलाही परब यांनी भाजपला लगावला. मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यात सक्षम आहेत. सीबीआयची कुणीही मागणी केली तर तपास त्यांच्याकडे देता येत नाही. सीबीआयला याची कारण द्यावी लागता, त्यानंतर तपास दिला जात असतो. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. गेल्या 5 वर्षात किती आत्महत्या झाल्या, किती हत्याकांड झाले आहे आणि त्यांचा तपास सीबीआयकडे दिला आहे. जे आहे ते समोर येऊ द्या, असे थेट आव्हानच परब यांनी फडणवीसांना दिले आहे.

महाराष्ट्रातील पोलिसांचे नितीश कुमार हे प्रमुख नाहीत. त्यांनी त्यांच्या राज्यात काय चालले आहे त्यावर बोलले पाहिजे. बिहारच्या निवडणुकीसाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. महाराष्ट्र पोलिसांना काही सांगण्याची गरज नाही. मुंबई पोलीस व्यवस्थितीत तपास करत आहे. ते सक्षम असून सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याच्या शब्दात नितीश कुमारांना टोला लगावला आहे.

या प्रकरणात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विनाकारण आरोप केले जात आहे. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा ही चांगली आहे. त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यावर गोंध्रा हत्याकांड, सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणातही आरोप झाले होते. अमित शहा यांना कारागृहात जावे लागले, अशा आरोपचे हे तंत्र आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत केले जात आहे. ते कालांतराने निर्दोष सुटले. अशाच आरोपांचे षड्यंत्र आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत रचले जात असल्याचा पलटवारही अनिल परब यांनी भाजपवर केला.