‘हे तर गलिच्छ राजकारण’, सुशांतच्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी सोडले मौन

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रातील राजकारणात चांगलेच तापले आहे. सीबीआय चौकशी, पोलीस तपास यावरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा देखील या प्रकरणाशी संबंध असल्याचा अप्रत्यक्ष आरोप सोशल मीडियावर होत होता. मात्र आता या प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य करत, ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू असून, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हणाले ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू दुर्देवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांना कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल, असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.