सध्याच्या डिजीटल युगात कोणतेही काम चुटकी सरशी होत असल्यामुळे केंद्र सरकारने देशातील नागरिकांना डिजीटल साक्षर करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी आता देशातील ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरवण्यावर भर दिला जात आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक गावांनी प्रगती करत आपले नाव जगाच्या नकाशावर झळकवल्याच्या बातम्याही आपण अनेकदा पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण देशात अद्यापही इंटरनेटचा स्पीड हा नेहमीच चर्चेचा विषय बनतो.
त्यात ग्रामीण भाग सोडा पण शहरी भागातही ग्राहकांना इंटरनेट स्पीडची समस्या भेडसावत असते. पण वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामधील येवता गावात सीएससी केंद्रात काम करणाऱ्या गजानन देशमुख यांनी एक शक्कल लढवली. त्यांना शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे अर्ज भरताना इंटरनेट स्पीडचा त्रास होत होता. देशमुख यांनी यासाठी घराच्या छतावर स्पीड चांगला येतो, म्हणून थेट छतावर खुर्ची आणि लॅपटॉपची सोय करत शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे अर्ज भरले. सध्या सोशल मीडियावर देशमुख यांचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पोस्ट All India Radio News Pune च्या फेसबूक अकाऊंटवरही करण्यात आला आहे.