सुशांतच्या आत्महत्येचा तपास करणाऱ्या पाटण्याच्या एसपींना मुंबई महापालिकेने केले क्वारंन्टाईन


मुंबई : रोज नवनव्या प्रसंगांना सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात मुंबईत दाखल झालेल्या बिहार पोलिसांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईत रविवारी (2 ऑगस्ट) दुपारी दाखल झालेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक (शहर) बिनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेने क्वारंन्टाईन केले आहे. त्यांना गोरेगाव येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये असलेल्या गेस्टरुममध्ये क्वारंन्टाईन करण्यात आले आहे. रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या हातावर स्टॅम्प मारुन त्यांना मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या बाबतच्या सूचना दिल्या आहेत. 15 ऑगस्टपर्यंत बिनय कुमार यांना क्वारंन्टाईनमध्ये राहावे लागणार आहे.

पण यावरुन मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते विनोद मिश्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेचा उपयोग मुख्यमंत्री या कामासाठी करीत असून याबाबत आयुक्तांना जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, आयपीएस बिनय तिवारी आज (2 ऑगस्ट) सरकारी ड्यूटीसाठी पाटणाहून मुंबईत दाखल झाले, पण मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री 11 वाजता त्यांना जबरदस्तीने क्वारंन्टाईन केले. त्यांनी विनंती करुनही आयपीएस मेसमधील निवासस्थान उपलब्ध करुन दिले नाही. गोरेगांवमधील एका गेस्ट हाऊसमध्ये ते थांबले होते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जे झाले ते योग्य झाले नाही. आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत. जे बिनय तिवारी यांच्यासोबत झाले, ते चुकीचे आहे. आम्ही या संदर्भात महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा करू.