संभाजी भिडेंची अयोध्येतील राम मंदिरात मिशीवाली मूर्ती बसवण्याची मागणी


सांगली : 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या अयोध्यातील राममंदिर भूमिपूजन सोहळ्याबाबत आज सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करतानाच एक मागणी देखील केली आहे. प्रभू राम अतुलनीय, पूज्यनीय पुरुष दैवत होते. पण राम-लक्ष्मणाला आतापर्यंतच्या फोटोंमध्ये मिशा नव्हत्या. आपल्याला आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने फोटोमध्ये राम दाखवले गेले. निदान अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या रामाच्या मंदिरात मिशीवाली रामाची मूर्ती असावी, अशी मागणी संभाजी भिडे गुरुजी यांनी अयोध्येमधील राममंदिर समितीला केली आहे.

अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा 500 वर्षांपासून प्रयत्न सुरु होता आणि आता तो साकारला जात आहे. देशातील तमाम हिंदू समाजासाठी आनंदाची बाब असल्यामुळे सध्या कोरोनाची परिस्थिती असली तरी देशातील हिंदू समाजाने कोरोनाला न घाबरता दिवाळी आणि दसऱ्याप्रमाणे हा सोहळा साजरा करावा. तसेच प्रत्येकाने यानिमिताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनही करावे, असे आवाहन संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निमंत्रण नसेल तरी अयोध्याला जावे असा सल्ला भिडे गुरुजींनी दिला आहे.

शरद पवार यांनी राम मंदिर भूमी पूजनाला केलेल्या विरोधावरून निशाणा साधताना ते म्हणाले की, शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाने अशा या पवित्र सोहळ्याचा विरोध करणे योग्य नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत गौरवोद्गार काढताना ते म्हणाले की, ठाकरे यांचे नेतृत्व अत्यंत चांगले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्यांनी आता महाराष्ट्रभर फिरून कोरोनाच्या बाबतीत असणारी भीती दूर करावी.

शिवसैनिकांनी ऑनलाईन भूमिपूजन करण्याची केलेली मागणी बाळासाहेब ठाकरे यांना आवडली नसती, असे देखील ते म्हणाले. जरी अयोध्या भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना नसले तरी त्यांनी अयोध्येला गेले पाहिजे. कारण की त्यांना कोणत्याही निमंत्रणाची गरज नसल्याचे मतही भिडे गुरुजी यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रतिमेचे पूजन करून राम मंदिर उभारणीस सुरवात करावी आणि आणि 32 किल्ल्यावरची माती आणि सरोवरातील पाण्याचा मंदिर उभारण्यात वापर करावा. माती आणि पाणी आम्ही अयोध्याला पाठवत असल्याचेही भिडे गुरुजी यांनी यावेळी सांगितले.