मुंबईसह राज्यातील काही भागात आगामी 24 तासात अतिवृष्टीचा इशारा


मुंबई : पावसाने जुलै महिन्यात काही भागांत ओढ दिल्यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच राज्यात ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होत असल्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात बहुतांश ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही प्रामुख्याने घाटमाथ्याच्या क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, विदर्भासह राज्यात 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी असणार आहे. जूनमध्ये राज्यात चांगला पाऊस झाला असला, तरी जुलैच्या पावसाने अनेक भागांत हुलकावणी दिली. उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचे संकेत आहेत. परिणामी राज्यात पावसाला अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. याच स्थितीमुळे काही ठिकाणी अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस, तर तीन ते चार दिवस राज्यात सर्वत्र पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर आज ऑगस्टला वाढणार आहे. या दिवशी कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील घाटक्षेत्रात मुसळधार पाऊस होईल. तर उद्या कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 5 ऑगस्टलाही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भातही कमी-अधिक पावसाचा अंदाज आहे.

तर अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड या भागांत शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार, तर नाशिक, नगर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होईल, अस पुणे वेधशाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे.