अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन टाळा मोदीजी – दिग्विजय सिंह


भोपाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अयोध्येतील राम मंदिर निर्माण भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन टीका केली आहे.

यासंदर्भात दिग्विजय सिंह सलग तीन ट्विट केली असून ते आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हणतात, मोदीजी तुम्ही अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करुन अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? आता योगीजी, तुम्हीच मोदींना समजावा, सनातन धर्माच्या सर्व मर्यादा तुम्ही असताना का तोडल्या जात आहेत? आणि तुमची अशी काय अडचण आहे, कि, तुम्ही हे सर्व होऊ देत आहोत? या कार्यक्रमाशी संबंधित असलेल्यांना भूमिपूजनासाठी निवडलेल्या अशुभ मुहुर्तामुळेच कोरोना व्हायरसची लागण होत असल्याच्या बाबीकडे दिग्विजय सिंह यांच्या ट्विटसचा रोख आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे दाखले दिले आहेत.

तर आपल्या अखेरच्या ट्विटमध्ये मोदीजींना माझी विनंती आहे, पाच ऑगस्टचा अशुभ मुहुर्त त्यांनी टाळावा, शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माणाचा योग आल्याचे दिग्विजय यांनी म्हटले आहे. कोट्यावधी हिंदुंच्या आस्थेचे प्रभु श्रीरामचंद्र केंद्र आहेत. हजारो वर्षांपासून धर्माच्या स्थापित मान्यतांबरोबर खेळू नका असा दिग्विजय सिंह यांनी सल्ला दिला आहे.