हे काय बोलून गेले सुब्रमण्यम स्वामी; राम मंदिरासाठी मोदींचे नाही तर राजीव गांधींचे योगदान


नवी दिल्ली – अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर अयोध्येत मोठ्या प्रमाणावर तयारीही सुरु आहे. याच दरम्यान भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक वक्तव्य करुन, खळबळ उडवून दिली आहे. राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोणत्याही प्रकारचे योगदान नसून यासाठी कुणाचे नाव घ्यायचे झाले तर माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागले, अशा शब्दांत भाजपला त्यांनी घरचा आहेर दिला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी हे वक्तव्य टीव्ही ९ भारतवर्ष या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. सध्या सोशल मीडियावर या चर्चेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांना चर्चेदरम्यान, प्रश्न विचारण्यात आला होता की, राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आणखी कोणाकोणाला निमंत्रण द्यायला हवे होते, ज्यांना देण्यात आलेले नाही. स्वामी यावर उत्तर देताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राम मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचे योगदान नाही. आम्ही यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सरकारच्यावतीने असे कोणतेही काम केलेले नाही, ज्यामुळे हे सांगता येईल की राम मंदिर उभारले जात आहे.

सुब्रमण्यम स्वामी पुढे म्हणाले, ज्या लोकांनी राम मंदिरासाठी काम केले त्यामध्ये राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि अशोक सिंघल यांचा समावेश आहे. राम मंदिराच्या कामामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील आडकाठी आणली होती, अशोक सिंघल यांनीच आपल्याला ही बाब सांगितली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलवर गेल्या ५ वर्षांपासून राम सेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याबाबतची फाईल पडून आहे. पण, आजवर त्यांनी यावर स्वाक्षरी केलेली नाही. कोर्टात जाऊन यावर आदेश मी मिळवू शकतो. पण, मला वाईट याच गोष्टीचे वाटत आहे की, आमचा पक्ष असतानाही आम्हाला न्यायालयात जावे लागत असल्याचेही स्वामी यांनी म्हटले आहे.