१ तारखेपासून लॉकडाऊन न पाळण्याचे प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन


मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला १ तारखेपासून लॉकडाऊन न पाळण्याचे, तसेच सर्वांनी दुकाने, टपऱ्या, टायपिंग इन्स्टिट्यूट त्याचबरोबर रिक्षावाल्यांनीसुद्धा फिरायला सुरू करा, असे आवाहन केले आहे. प्रकाश आंबेडकर औंरगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. जो लॉकडाऊन आता लागू करण्यात आला आहे, तो मान्य करू नका. लॉकडाऊनच्या सुचना मान्य न करता आधीसारखेच जीवन सुरू करा, असे देखील आंबेडकर म्हणाले.

लॉकडाऊनला आमचा पाठिंबा नाही हे दर्शवण्यासाठी ज्या झेंड्याला तुम्ही मानत असाल, तो झेंडा लोकांनी घरी, गच्चीवर फडकवण्याचे आवाहन देखील त्यांनी जनतेला केले. तिरंगा फडकवलात तर अधिक चांगले होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. हे आवाहन केल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल करुन, मला अटक केली तरी चालेल, मी घाबरत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परराज्यातील कामगारांचे जे हाल झाले, तेच हाल लघुउद्योजकांचे होत आहेत. लोकांवर उपासमारीची परिस्थिती ओढावली आहे. ८० कोटी कुटुंबांना अन्नधान देऊ म्हणाले होते, पण ते वाटलेले काही दिसत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राज्य किंवा केंद्र शासनाकडे कोरोना संदर्भात सत्य स्थिती मांडायला राजकीय हिम्मत आणि नेतृत्व नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. लोक भूकबळी आणि इतर आजारामुळे मरत आहेत. हे लॉकडाऊन चक्रामध्ये दोन्ही शासन स्वतःहून अडकले आहेत. त्यांना बाहेर पडण्याचा रास्ता दिसत नाही. सर्वसामान्य जनतेनेच शासनाला रास्ता दाखवण्याची गरज आहे. 3 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने सार्वजनिक वाहतूक सुरू करा, असे देखील आवाहन त्यांनी शासनाला केले आहे.