राष्ट्रीय युद्ध स्मारकावर गलवाण खोऱ्यातील २० शहिद जवानांची नावे


नवी दिल्ली – १५ जूनला चिनी सैन्यांसोबत झालेल्या चकमकीत पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात शौर्याने लढताना शहीद झालेल्या २० भारतीय जवानांची नावे राजधानीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली जाणार असून काही महिन्यांचा कालावधी यासाठी लागू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

१५ जूनच्या रात्री गेल्या पाच दशकांतील सर्वात भीषण संघर्ष भारत व चीन यांच्या लष्करांमध्ये झाला होता. गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉइंट १४च्या परिसरात चीनतर्फे उभारण्यात येणाऱ्या टेहळणी चौकीला भारतीय जवानांनी विरोध केल्यानंतर, चिनी सैनिकांनी खिळे लावलेल्या काठय़ा, लोखंडी कांबी वापरून त्यांच्यावर भीषण हल्ले केले होते. यात शहीद झालेल्या लष्करी जवानांमध्ये १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल बी. संतोष बाबू यांचा समावेश होता.

पूर्व लडाखच्या सीमेवरील तणाव या घटनेमुळे मोठय़ा प्रमाणात वाढला. ‘चीनची पूर्वनियोजित कृती’ असे भारताने याचे वर्णन केले होते. १७ जुलैला पूर्व लडाखमधील लुकुंग सीमा चौकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या भेटीत, बिहार रेजिमेंटच्या जवानांनी चिनी सैन्याशी लढताना दाखवलेल्या अतुलनीय धैर्याचे कौतुक केले होते.