नवी दिल्ली – देशात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून देशात मागील २४ तासांत देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. देशात मागील २४ तासांत ५५ हजार ७९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ लाखांच्या पुढे गेली आहे.
यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १६ लाख ३८ हजार ८७१ एवढी देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. पण यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर आतापर्यंत दहा लाख ५७ हजार ८०६ रुग्णांनी यशस्वीरित्या मात केली आहे. तर देशभरात सध्या पाच लाख ४५ हजार ३१८ जणांवर उपचार सुरु आहेत. पण याच दरम्यान एक चिंताजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत ७७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एकूण कोरोनाबळी ३५ हजार ७४७ झाले आहेत.
दिल्लीमध्ये ३९०७, तमिळनाडूमध्ये ३७४१, गुजरातमध्ये २१४७, उत्तर प्रदेशमध्ये १५३०, पश्चिम बंगालमध्ये १४९०, आंध्र प्रदेशमध्ये १,२१३, मध्य प्रदेशमध्ये ८४३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मरण पावलेल्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक लोकांना एकाहून जास्त व्याधी होत्या. कोरोना रुग्णांचा देशातील मृत्यूदर २.२३ टक्के एवढा असून जागतिक स्तरावरील मृत्यूदरापेक्षा तो कमी आहे. १९ जून रोजी देशातील मृत्यूदर ३.३ टक्के होता. देशात सर्वाधिक मृत्यू आणि कोरोनाबाधित महाराष्ट्रात जास्त आहे. राज्यात मुंबई आणि पुण्याची परिस्थिती चिंताजनक आहे.