योगी आदित्यनाथ यांना वगळता राममंदिर भूमिपूजनाचे एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही


लखनौ : सर्वधर्मीय लोक अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 5 ऑगस्टला राममंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. पण गरज पडल्यास या यादीत फेरबदल करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण सध्या तयार करण्यात आलेल्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वगळता देशातील एकाही मुख्यमंत्र्यांला निमंत्रण देण्यात आलेले नाही.

दरम्यान शिवसैनिकांसह अनेकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अयोध्या रामजन्मभूमीचे भावनिक नाते आहे. त्याचसोबत उद्धव ठाकरे यांनीही अयोध्या आणि शिवसेनेचे नाते पुढे टिकवून ठेवले. पण तरी देखील राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने उद्धव ठाकरे यांना भूमिपूजनाचे निमंत्रण दिले नाही. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले तर सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवावे लागेल. निवडक मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिल्यास वाद उद्भवू शकतो आणि सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सर्व मुख्यमंत्र्यांना बोलवणे शक्य नसल्यामुळे केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

सर्व धर्मांच्या आचार्यांना भूमिपूजनाला बोलण्याचा निर्णय झाला आहे. राममंदिर खटल्याचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांचेही नाव पाहुण्यांच्या यादीत आहे. बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजाचे काही विशेष मान्यवरांना बोलावण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनाह निमंत्रण आहे. अमित शहा आणि राजनाथ सिंह यांचे नाव या यादीत सामील आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण आहे. त्याचबरोबर या यादीमध्ये योगगुरु बाबा रामदेव यांच्याही नावाचा समावेश आहे.