शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याच्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांचा यू टर्न


पुणे – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरुन आता त्यांनी यू टर्न घेत माझ्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याचे पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की, माझे विधान उलटे वाचले गेले. मी असे म्हणालो होतो की, आमच्या पक्षाचे सरकार जर उद्या आले, तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व विधानसभा, लोकसभा आम्ही स्वबळावरच लढणार आहोत. भाजपच्या वोट बँकेवर आणि मोदींच्या चेहऱ्यावर विजयी व्हायचे नंतर काही तिसरच करायचे, हे आता चालणार नाही. त्यापेक्षा प्रत्येकाने स्वबळावर लढावे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे सरकार येण्याबाबत हा विषय नव्हता तर निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबतचा विषय होता. त्यामुळे शिवसेनाच काय इतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव नसल्याचे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले.